क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या २१ व्या गाळप हंगामामध्ये १४ लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, यासाठी कारखाण्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले. ते गाळप हंगामाच्या मिल रोलर पुजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी अरुण लाड म्हणाले, यावर्षी परिसरात ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांच्या पाण्याचा पुरवठा झाल्याने यापुढेही उसाचे उत्पादन जास्त होणार आहे. नोंदवलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत करण्यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण ५००० मे टनावरून ७५०० मे टन प्रति दिन करण्याचे काम सुरू केले आहे. या वर्षी पासून केंद्र शासनाच्या धोरणाने इंधनाची गरज लक्षात घेवून सिरप पासून इथेनॉल निर्मिती करून देशाची इंधनाची गरज भागविण्यासाठी हातभार लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षी कारखाना ७५०० प्रति मे टनाने प्रतिदिन ऊस गाळप करणार आहे त्यामुळे ऊस तोडणीमध्ये अजूनही सुसूत्रता येवून संपूर्ण ऊस गळीत वेळेत होईल. ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांच्या हितासाठी शासनाने यावर्षी साखर निर्यातिचे धोरण गत वर्षीप्रमाणे अंवलंबवावे तसेच पेट्रोलीयम कंपन्यांनी कारखान्याकडून इथेनॉल खरेदी वेळच्या वेळी करून त्यातील टँकर खाली करण्यासाठी होणारी दिरंगाई टाळणेसाठी ठोस उपाय योजना कराव्यात.
अरुणअण्णा लाड पुढे म्हणाले, कारखाण्याकडे सध्य स्थितीला १४ हजार हेक्टर ऊस नोंद आहे यातून १४ लाख मे.टन गळापाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने कारखान्याची अंतर्गत कामे पुर्णत्वाच्या दिशेने जात आहेत. ऊस तोडणी वाहतूकीचे करार झाले आहेत तसेच मजुरांनाही ॲडव्हान्स दिलेले आहेत.
कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनखाली आणणेसाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. परिसरातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने आपण ऊसाला दर दिला आहे आणि यापुढे हि देऊ. तरी शेतक-यांनी आपल्या नोंद क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.